थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध | Thand Haveche Thikan Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध / Thand Haveche Thikan Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत.

Thand Haveche Thikan Essay In Marathi

Thand Haveche Thikan Essay In Marathi

थंड हवेचे ठिकाण निबंध

[मुद्दे : आंबोली – निसर्गाचे वरदान लाभलेले एक छोटेसे गाव -गरिबांचे महाबळेश्वरमहादेवगड, नारायणगड आंबोलीतील नदी-आंबोलीतील झाडे आगळेपणा-धबधबा साधेपणा  ]

आम्ही डोंगराच्या एका कड्यावर उभे होतो. खाली खोल दरी पसरली होती. इंग्रजी ‘सी’ अक्षराचा आकार डोंगराला लाभला होता. आईने आपल्या लहानग्याला पुढ्यात घेऊन बसावे, तसे तो डोंगर दरीतल्या गावाला पुढ्यात घेऊन बसला होता.

सगळीकडे हिरवेगार साम्राज्य पसरले होते. भर दुपारी डोळ्यांना गारवा जाणवत होता. दुपारचे बारा वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता. ऊन मात्र कोमल-शीतल बनले होते. शीतल वाऱ्याचे झोत दरीतून वर आमच्या अंगावर झेपावत होते.

दूरवर डोंगरांच्या रांगा पसरल्या होत्या. संपूर्ण क्षितिज डोळ्यांत सामावण्यासाठी मान अर्धवर्तुळाकार फिरवावी लागत होती. इतका विस्तृत अवकाश कधीही पाहिला नव्हता. निसर्गाचे हे विस्तृत दर्शन मनाला सुखावत होते.

सर्वांच्याच चेहऱ्यावर हे निसर्गसुख तरळत होते. गेले दोन-तीन दिवस आम्ही येथे मनसोक्त भटकत होतो. हे होते निसर्गाची कृपा लाभलेले डोंगरमाथ्यावरचे आंबोली हे छोटेसे गाव.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागली आहे. त्याला ‘गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखतात. आईच्या मैत्रिणीचे माहेर येथे होते, म्हणून आम्हांला सुट्टीत येथे यायची संधी मिळाली होती.

अजूनही ‘आंबोली’ या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही, म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टुमदार खेडेगावच आहे. या घाटमाथ्यावरून सुंदर दृश्ये दिसणारी ठिकाणे आहेत.  ती पॉइन्टस् म्हणूनच ओळखली जातात.

तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात. या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो. ती स्थाने म्हणजे ‘महादेवगड’ आणि ‘नारायणगड’. गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुणा आज आढळत नाहीत.

या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे. अगदी थोड्या पैशात ते भाकरी, पिठले, कढी देऊन आपले स्वागतही छान करतात. आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात; पण खासकरून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते.

निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आणि शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात न्हाऊन आपल्या थकव्याला पळवून लावतात. आंबोली बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान दिसते.

येथे पार्वतीदेवीचे मंदिर आहे. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी कथा सांगितली जाते. पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात.

या हिरण्यकेशी नदीवर असलेला नागरतास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा, काजू यांचे वरदान लाभलेले आहेच; पण त्याशिवाय हिरडा, जांभूळ, ऐन, अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे.

आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगीबेरंगी झाडे, पाने, फुले दिसतात की, काय पाहू आणि काय नको असे होते. अजून आंबोली हे एक डोंगरमाथ्यावरील टुमदार खेडे आहे. तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचली नाही. त्यामुळे तेथे पुन:पुन्हा जावेसे वाटते.

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • एक थंड हवेचे ठिकाण निबंध मराठी / Thand Haveche Thikan Marathi Nibandh
  • थंड हवेचे ठिकाणावर मराठी निबंध / Thand Haveche Thikan Marathi Essay
  • थंड हवेचे ठिकाण निबंध दाखवा / Write Essay On Thand Haveche Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध / Essay On Thand Haveche Thikan In Marathi नक्कीच आवडले असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group