कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध | Kanishtha Mahavidyalayacha Nirop Ghetana Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध / Kanishth Mahavidyalayacha Nirop Ghetana Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

Kanishtha Mahavidyalayacha Nirop Ghetana Essay In Marathi

कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध

(मुद्दे : कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेण्याचा मार्गदर्शन – अभ्यासाचे खास आठवण – शिक्षकांचे महाविद्यालयातील अनुभवांची आत्मसात – चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी – मित्रांसोबत काही अभिनव कृती – गप्पाटप्पा, गाणी, चित्रपट – नवीन छंद महाविद्यालयाकडून आत्मविश्वासाने जगण्याचा मार्ग )

आज बारावीचा शेवटचा पेपर. माझी आसन व्यवस्था माझ्याच महाविद्यालयात होती. पेपर संपत आला, तसे मन अस्वस्थ होऊ लागले. एक वेगळीच हुरहूर मनात दाटून येऊ लागली. पेपर संपला, तरी मला जागेवरून उठवेना.

मी काही वेळ बाकावरच बसून राहिलो. काहीतरी संपत चालले होते. ओंजळीतील वाळू बोटांच्या फटीतून भुळुभुळु गळून पडावी, तसे काहीतरी निसटून चालले होते. गेल्या दोन वर्षांतील अनेक घटना नजरेसमोर तरळू लागल्या.

या दोन वर्षांनी मला भरभरून दिले आहे. अनेक चांगल्या घटना घडल्या. अनेक चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. या दोन वर्षांनी मला शहाणे केलेय. दहावी संपताना वाटायचे… आईबाबा मला उगाच लहान समजतात.

मी लहान का राहिलोय? मला सर्व काही समजतेय. मी खूप शहाणा आहे… पण आता लक्षात येतेय. मी त्या वेळी खरेच लहान होतो. अकरावी-बारावीच्या दोन वर्षांनी मला खऱ्या अर्थाने मोठे केले. मला शहाणे केले. मी जागेवरून उठलो आणि वर्गाबाहेर पडलो.

महाविद्यालयाच्या आवारात शांतपणे एक फेरी मारली. अनेक जागांना भेटी दिल्या. एकेक घटना डोळ्यांसमोरून सरकत गेली. खरे तर मी काही बुद्धिमान विद्यार्थ्यांपैकी नव्हतो. खेळात प्रवीण नव्हतो. किंवा गायन-वादन, अभिनय अशा कला मला अवगत नव्हत्या. साधा सर्वसाधारण विद्यार्थी होतो. पण या महाविदयालयाने मला खूप काही शिकवले. जगण्यासाठी फार मोठी सामग्री दिली. आत्मविश्वास दिला.

आमच्या या महाविद्यालयात टीचर-गाइड-स्कीम या नावाची योजना आहे. या योजनेनुसार एकेका शिक्षकांकडे दहा-पंधरा विद्यार्थी सोपवले जातात. त्या विदयार्थ्यांच्या कोणत्याही अडचणींमध्ये त्यांना संबंधित शिक्षकांनी मार्गदर्शन करायचे. अशी ती योजना होती. आमच्या शिक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच आमच्या गटाला इंग्रजी संभाषणकला शिकवायला सुरुवात केली. याचा आम्हांला जबरदस्त फायदा झाला.

आम्ही इंग्रजीत बोलू लागलो. वर्गामध्ये प्रश्नोत्तरात, चर्चांत भाग घेऊ लागलो. आमच्या या शिक्षकांनी आणखी एक उत्तम गोष्ट केली. त्यांनी परीक्षेचे तंत्र झकास शिकवले. अभ्यासक्रम कसा समजून घ्यावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते, प्रश्न कसे तयार करतात, उत्तरे कशी तयार करायची या बाबी त्यांनी बारकाईने समजावून सांगितल्या.

त्यामुळे अभ्यासाची गुरुकिल्लीच हाती गवसली. अभ्यासाची भीती नाहीशी झाली. पहिल्या घटक चाचणीत चांगले गुण मिळाले. मी खूश आणि आईबाबाही खूश. माझा आत्मविश्वास वाढला. वावरण्यात रुबाब आला. महाविद्यालयीन दिवस आनंदी बनले. माझे भाग्य असे की, येथे मला खूप चांगले मित्र मिळाले. त्यांच्यामुळे मी काही उपक्रमांमध्ये सहभागी झालो.

त्यांच्यामुळे पायी भटकण्यातला आनंद कळून आला. कधी कधी आम्ही बसमध्ये बसायचो. कोणत्यातरी एका थांब्यावर उतरायचो आणि तास दोन तास त्या परिसरात पायी फिरायचो. अशा प्रकारे परिसराच्या निकट असण्यातले सुख अनेकदा अनुभवले.

मित्रांमुळे मला चांगले चित्रपट, चांगली गाणी यांचा आस्वाद घेता आला. गप्पा रंगल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला एक विलक्षण छंद गवसला… ओरिगामी! मित्रांबरोबर पाण्यात होडी सोडण्याच्या गमती करता करता कागदाच्या घड्या करून विविध वस्तू, पक्षी, प्राणी बनवता येऊ लागले. जेथे जाईन तेथे माझे कौतुक होऊ लागले.

लहान मुलांचा तर मला गराडा पडू लागला. मलाही त्याची चटकच लागली. मी मग रत्नाकर महाजन, अनिल अवचट अशा लेखकांची ओरिगामीवरची पुस्तके वाचून नवनवीन आकार शिकू लागलो. जेथे जाईन तेथे माझा प्रभाव पडू लागला. आता तर मी सोबत कागद घेऊनच फिरतो आणि आनंद मिळवत राहतो.

या महाविद्यालयाने माझ्यासारख्या एक अगदी सर्वसाधारण विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने व अभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. अशा या महाविद्यालयापासून आता मला दूर जावे लागतेय, त्याचा निरोप घ्यावा लागतोय, या जाणिवेने माझी पावले जड होऊ लागली.

हे निबंध सुद्धा वाचा :

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

  • महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध / Mahavidyalayacha Nirop Ghetana Marathi Nibandh
  • आमच्या विद्यालयाचा निरोप समारंभ / Aamchya Vidyalayacha Nirop Samarambh
  • शाळा-कॉलेज चा निरोप घेताना निबंध मराठी / Send off Marathi Nibandh

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x