बहरलेले वृक्ष मराठी निबंध | Baharlele Vruksha Essay In Marathi

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण बहरलेले वृक्ष मराठी निबंध / Baharlele Vruksha Essay In Marathi Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Baharlele Vruksha Essay In Marathi

Baharlele Vruksha Essay In Marathi

(मुद्दे: शंभर वर्षापूर्वीची वृक्षराजीने वेढलेले मुंबई – वृक्ष माणसांचे सगेसोयरे – विविध रंग, आकार, गंध यांनी परिसर नटणे – माणूस खऱ्या वृक्षराजीने न जाता बोन्साय वृक्षांकडे जातो – पक्षी, प्राणी, फुलपाखरे माणसांपेक्षा शहाणी)

काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ दैनिकात शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मुंबईवर सचित्र लेखमाला येत होती. ती मुंबईची चित्रे पाहून मन हळहळले. ती शंभर वर्षांपूर्वीची मुंबई वृक्षांनी वेढलेली होती. आकाशाला भिडणारी उंच नारळाची झाडे. माडांच्या सोबतीने वाढणारी गर्द हिरवी ताडांची झाडे. कमी उंचीचे; पण डेरेदार इतर वृक्ष. त्या हिरव्या वैभवावर नजर ठरत नव्हती. त्याच मुंबईत आज काय आढळते? तर सिमेंटची जंगले. ही जंगले उभी करण्यासाठी हिरव्या जंगलाची तोड करण्यात आली. या हिरव्या वैभवाचा नाश करून माणसाने आपल्या इमारती उभ्या केल्या, तेव्हा त्याला जाणीवही नव्हती की आपणच आपले केवढे नुकसान करून घेत आहोत!

खरे तर ही वृक्षवल्ली म्हणजे माणसाचे सगेसोयरेच आहेत. ती माणसाला सुखच देत असतात. गर्द लाल फुलांनी डवरलेला गुलमोहर ग्रीष्माच्या तापदायक वातावरणातही माणसाच्या डोळ्यांना आणि मनाला आल्हाददायक थंडावा देतो. बहरलेला बहावा मरगळलेल्या मनाला पुन्हा उत्साह देतो. पानगळीनंतर पुन्हा नव्या कोवळ्या पानांनी भरगच्च सजलेला पिंपळ आपल्या पानांच्या सळसळींनी माणसाला जणू खुणावतो, “अरे, क्षुल्लक अपयशाने काय खचतोस? अशा अपयशातूनच नव्या यशांचा मोहोर फुलणार आहे.” साधे बाभळीचे झाड, पण या बाभळींना गंधवेडा बहर येतो. वाटेवरच्या आम्रवृक्षांना फाल्गुनाच्या सुमारास येणारा मोहोर ‘आंबेमोहोराची’ जाणीव देऊन वेडे करतो. छोट्या छोट्या पानांचे चिंचेचे झाड पण ते त्याच्या पालवीच्या डेरेदारपणाने भर उन्हाळ्यात थंड सावलीने अनेकदा विसावा देते. त्याला लगडलेल्या आंबटगोड चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटते.

माणसाला या वृक्षांची सतत संगतसोबत असते. ग्रीष्माच्या तप्ततेवर पावसाचा शिडकावा होतो आणि पानोपानी वसुंधरा मोहरते. श्रावण-भाद्रपदात फळाफुलांनी लगडलेले वृक्ष माणसाला चैतन्य देतात. पारिजातकाच्या बहारदार फुलांचा झाडाखाली पडलेला सडा माणसाला उदारतेचे धडे देत असतो. रात्री फुलणारी रातराणी, पहाटेला हसणाऱ्या जाईजुई माणसाला वेडावून टाकतात. थंडीची चाहूल लागताच चेरीची झाडे गुलाबी साज चढवतात. शिशिराच्या आगमनाने हिरमुसलेली ही निसर्गसृष्टी थंडी संपताच बहरू लागते. टॅबुबियाच्या पिवळ्या, गुलाबी फुलांचा बहर सुरू होतो.

पाठोपाठ पळस, पांगारे फुलू लागतात. काटेसावरी निष्पर्ण फुलते, साग बहरतात. वसंताचे आगमन होते आणि साराच नूर बदलतो. आंबा, फणस, जांभूळ, निंब सर्व सृष्टीच बहरत रंगगंधाने वेडी होते. या बहराकडे पाठ फिरवून माणूस जेव्हा आपल्या घराच्या दिवाणखान्यात एखादे ‘बोन्साय’ ठेवून स्वत:च्या रसिकतेची पताका फडकवतो, तेव्हा त्याच्या क्षुद्रतेला हसावेसे वाटते आणि त्याच्या कानात गुणगुणावेसे वाटते की, ‘अरे, चार भिंतींतून बाहेर पड आणि वृक्षांच्या राईत पळ. त्यासाठी राष्ट्रीय उद्यानांत जा. तेथे तुला तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, फुलपाखरे, प्राणी भेटतील. मगच तुला जाणवेल की, तुझ्यापेक्षा हे कीटक, ही पाखरेच अधिक शहाणी आहेत.

हे पण वाचा:

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • बहरलेले वृक्ष मराठी निबंध / Essay on Baharlele Vruksha
  • वृक्ष वर निबंध दाखवा / Write Essay On Vruksha
  • वृक्ष मराठी निबंध / Vruksha Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की बहरलेले वृक्ष मराठी निबंध लेखन / Essay on Baharlele Vruksha In Marathi निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद

WhatsApp Group Join Group